छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर येथील बनकरवाडी येथील बारा ते चौदा वर्षे वयाच्या चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जानेवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १४ वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय १३ वर्षे, चौघे रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
रांजणगाव येथील अफरोज आणि अबरार शेख हे दोन भाऊ त्यांचे मित्र बिस्वजित कुमार आणि कुणाल दळवी गुरुवारी दुपारच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर पडले. मात्र सायंकाळ झाल्यावरही मुलं घरी परत न आल्यानं अफरोज यांच्या वडिलांनी शोध सुरू केला. सर्वत्र तपास घेऊनही मुलं सापडत नसल्यानं त्यांनी बनकरवाडी तलावाकडं धाव घेतली. त्यावेळी मुलं पाण्यात पडल्याचा त्यांना संशय आला. स्थानिक नागरिकांनी लगेचच ही बाब पोलिसांना कळवली. तसंच अग्निशमन दलाच्या जवानांना देखील बोलवण्यात आलं. जवानांनी शोध कार्य सुरु करत रात्री उशिरा चौघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं वाळूज परिसरात मात्र शोककळा पसरली आहे