जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यातूनच यश- प्राचार्य रतन दुर्गे 

49

जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यातूनच यश- प्राचार्य रतन दुर्गे

अहेरी : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत. अनेक खेळाडू ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहे. म्हणून कोणत्याही खेळात यश मिळवायचे असेल तर जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूंना सोबतीला ठेवावा लागेल असे मत प्राचार्य रतन दुर्गे यांनी व्यक्त केले.

सृजनशील क्रीडा मंडळ महागाव कडून क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रतन दुर्गे होते. उद्घाटक गडचिरोलीचे शल्य चिकित्सक डा यशवंत दुर्गे होते. प्रमुख पाहुणे प्रा. किशोर बुरबुरे, ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलवणे, प्रतिष्ठित नागरिक सदाशिव गर्गम इत्यादी होते.

क्रिकेटच्या मैदानाची फीत कापून डॉ. यशवंत दुर्गे यांनी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन केले.

प्रसंगी उपस्थित क्रिकेट खेळाडू व क्रिकेट रसिकांना मार्गदर्शन करताना रतन दुर्गे म्हणाले की, क्रिकेट या खेळाची व्यापकता मोठी आहे. मोठ्या शहरांपासून तर खेड्या पर्यंत हा खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या खेळात यश मिळवणे कठीण असले तरी अशक्य नाही. म्हणून जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वास या तीनही बाबी सोबत असल्या तर ग्रामीण भागातला खेळाडू राष्ट्रीय पातळी पर्यंत पोहोचू शकतो.

प्रत्येक खेळाडूने कोणत्या ना कोणत्या खेळाशी संबंधित असले पाहिजे. पण सोबत आपल्या भविष्याची तयारी म्हणून आपल्या शैक्षणिक बाबीकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. अशा दुहेरी पद्धतीने आजच्या स्थितीत खेळाडूंनी जगणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महेश अलोने यांनी केले. उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने महागाव येथील युवक वर्ग उपस्थित होता. प्रसंगी एक ते सातच्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून नोटबुक आणि पेन चे वितरण करण्यात आले.