एटापल्ली येथे भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची रुजवण
एटापल्ली, दि. १६ जानेवारी
भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, हक्क-कर्तव्यांची जाणीव आणि नागरिकत्वाची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV), एटापल्ली येथे आज उत्साहात पार पडले.
ही तालुकास्तरीय स्पर्धा बुरडकर गटशिक्षणाधिकारी, एटापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्पर्धेत एटापल्ली तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता ६ वी ते १० वी मधील एकूण १०२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नमंजुषेद्वारे विद्यार्थ्यांची संविधान विषयक समज, सामान्यज्ञान व तार्किक विचारक्षमता यांची प्रभावीपणे चाचणी घेण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन श्री. अनिल गजबे (कार्यक्रम प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र, एटापल्ली येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने परिश्रम घेतले.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात येणार असून त्यासाठी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी गट साधन केंद्र, एटापल्ली येथे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता वाढीस लागली असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.






