ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकविण्यासाठी तयारीला लागा : शेकापचे नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन
गडचिरोली : ग्रामपंचायती या गावाचा स्थानिक विकास साधण्याचे माध्यम असल्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकविण्याच्या ध्येयाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनात्मक मजबूतीसाठी कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात गडचिरोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संघटन बांधणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यात काॅर्पोरेट कंपन्यांसाठी शासनाने एमआयडीसी घोषित करुन शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटू नयेत यासाठी नवीन एमआयडीसी क्षेत्रासाठी ग्रामपंचायत – ग्रामसभांनी विरोधाचे ठराव करावेत, शेतकऱ्यांच्या शेत जमीन बळजबरीने भूसंपादन होण्यासाठी जबाबदार असलेल्या लोह खाणींविरोधातील संघर्षात तालुक्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी करणे, विधवा निराधार वयोवृद्धांची पेंशन योजनेत वाढ, अव्वाच्या सव्वा वीजबिल देणारे स्मार्ट मीटर रद्द व्हावे, कर्जमाफी आणि नवीन पीककर्जाची तातडीने अंमलबजावणी व शेतकऱ्यांना वेळेत आणि मुबलक बी – बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करण्यात यावेत या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तरुणांना शेतकरी कामगार पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असेही या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, महागू पिपरे, उमाजी मुनघाटे, किसन साखरे, दादाजी कांबळे, राकेश भोयर, आशिष मेश्राम, शालिकराम भोयर, रुमाजी मेश्राम, दिपक मानकर, राजू जराते, प्रदीप मेश्राम, ताराचंद जेंगठे, आनंदराव मेश्राम, डोनूजी साखरे, रामदास दाणे प्रामुख्याने उपस्थित होते.





