Home Breaking News *महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार ‘ मुंडण ‘* *समग्र...

*महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार ‘ मुंडण ‘* *समग्र शिक्षा आंदोलनाचा 57 दिवस : सरकारला प्रतीक्षा आंदोलनकर्त्यांच्या मरणाची*

81

*महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार ‘ मुंडण ‘*

 

*समग्र शिक्षा आंदोलनाचा 57 दिवस : सरकारला प्रतीक्षा आंदोलनकर्त्यांच्या मरणाची*

 

मुंबई / प्रतिनिधी /ता. ५

 

प्रगतीशील महाराष्ट्रात महिला पहिल्यांदाच मुंडण करणार करणार असून ही स्थिती खुद्द राज्यसरकारने शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आणली आहे. 9 मार्च 2026 पासून राज्यातील समग्र शिक्षा अभियानाचे तीन हजाराचे वर कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत असून यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० एप्रिल रोजी पुरुषांनी मुंडण आंदोलन केले आहे. आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेणार का ? असा प्रश्न आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

 

देशात लाडक्या बहिणी व महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना प्रगतीशील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या रास्त मागण्यासाठी ५६ दिवस उपोषण व इतर आंदोलन करावे लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात ५६ दिवसाच्या आंदोलनानंतर सुद्धा एकाही मंत्र्याने दखल घेतली नसल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी महिला मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे. ७ तारखेपर्यंत सरकारने नियमित करण्यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास ८ मे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व महिला कर्मचारी मुंडण करणार असल्याचे निवेदन शासनास सादर केले आहे.

 

मागील २० ते २५ वर्षापासून शासन सेवेत कायमच्या प्रतीक्षेत असलेले समग्र शिक्षा अभियानाचे तीन हजारांवर कर्मचारी ९ मार्चपासून तीन हजारवर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहे. विशेष म्हणजे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना २०२४ मध्ये सेवेत नियमित करण्यात आले. एकाच अभियानातील अर्धे कर्मचारी कायम व सेवाजेष्ठ कर्मचारी कंत्राटी असल्याने राज्यात असंतोषाचे वातावरण आहे.

 

सन २००१ पासून समग्र शिक्षा अभियान सुरू झाले त्याच वेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण व शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी विषयसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा, एम आय एस कोऑर्डिनेटर, इंजिनिअर, जिल्हा समन्वयक, सहायक कार्यक्रमाधिकारी अशी अनेक पदे सहा-सहा महिन्यांच्या करारावर व मानधन तत्त्वावर भरली गेली होती. गत २० ते २५ वर्षात प्रत्यक्ष सेवेदरम्यान तब्बल २५७ कर्मचारी विविध कारणाने मृत्यूमुखी पडले.

 

आंदोलनाचे ५६ दिवस :

सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्यासाठी कधी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांचेकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली. कधी रस्ता रोको, वृक्ष चढाई, थाळीनाद, पुरुषांचे मुंडण आंदोलन तर कधी गाण्यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले. ५६ दिवसात अनेक खासदार,आमदार, विविध पक्ष व संघटनाचे नेते आझाद मैदानावर आले मात्र ह मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर फिरकले नाही हे विशेष.

 

मुख्यमंत्र्यांनीही केले नेतृत्व :

विरोधी पक्षात असताना भाजप मधील सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे,देवेंद्र फडणवीस यांनी २००८ पासून समग्र शिक्षा आंदोलनाचे नेतृत्व करत तत्कालीन सरकारवर आसूड ओढले. आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये कायम करण्याचे अभिवचन २०१२ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिले. २०२५ मध्ये हिवाळी अधिवेशन आंदोलन दरम्यान स्वतः मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांचे उपोषण सोडण्यासाठी कायमचे आश्वासन दिले. परंतु अजूनपर्यंत शासनाने निर्णय घेतला नाही.तरी शासनाने त्वरित निर्णय घेऊन समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्वरित निर्णय घावा.

Don`t copy text!