महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार, विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांची कायदा निर्मितीची सूचना

159

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार,
विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांची कायदा निर्मितीची सूचना

मुंबई दि. 02 फेब्रुवारी – स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने तयार करावा अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी आज दिल्या.
श्री. प्रदिप महादेवराव उके, नागपूर यांनी या संदर्भात मा. विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसेच याचिका सादर केली आहे. त्यासंदर्भात आज दि. 02 फेब्रुवारी, 2021 रोजी विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री, श्री. अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य आ.श्री. अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव श्री. राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्री. बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव श्री.भुपेंद्र गुरव आदि उपस्थित होते.
अर्जदारातर्फे ॲड. सतिश उके यांनी यासंदर्भात निवेदनातील भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मतपत्रिका अथवा इव्हीएम कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे. हे जनतेला ठरवू दया, यासंदर्भातील जनभावनेची दखल घेऊन कायदा तयार करणे ही विधानमंडळाची जबाबदारी आहे. इव्हीएम संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून अद्यापही जनमानसात या इव्हीएम कार्यप्रणालीबद्दल साशंकता आहे. यामुळे मतपत्रिका या पारंपारिक मतदान पत्रिकेचा पर्याय देखील मतदारांना उपलब्ध असला पाहिजे असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणूकांच्याबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधान मंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातील जनतेला इव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा. यानुसार इच्छेनुरुप, मतदार हे इव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील.
हा कायदा अमलात आल्यास याचा परिणाम निवडणूक निकालात दिसण्याची दाट शक्यता आहे.