बळजबरी प्रकल्पांविरोधात व्यापक संघर्षाची गरज जनतेने मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन

15

 

बळजबरी प्रकल्पांविरोधात व्यापक संघर्षाची गरज

 

जनतेने मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन

 

गडचिरोली : विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात विविध प्रकल्प होवू घातले असून स्थानिक भूमीपुत्र विरोध करीत आहेत. विकासाला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण स्थानिक जनतेला विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने प्रकल्प होत असतील ते खपवून घेतल्या जाणार नसून जिल्हाभरातील भूमिपुत्र, डावे – प्रागतिक राजकीय पक्ष, संघटनांनी एकत्र येवून याविरोधात व्यापक संघर्ष करण्याचे व लुटीचा डाव हाणून पाडण्याचे काम करावे लागणार असून जिल्ह्यातील जनतेने या संघर्षात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डाव्या प्रागतिक पक्षांनी केले.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भाई रामदास जराते यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील बळजबरी प्रकल्पांविरोधात तीव्र रोष जनतेमध्ये आहे. मात्र लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद असल्याने एट्टापल्ली सह कोरची तालुक्यातील लोह खाणीमुळे ग्रामसभांचे वनहक्क आणि जिंदाल स्टील, विमानतळ, भेंडाळा, कोनसरी एमआयडीसी यामुळे शेतकऱ्यांची खासगी शेतजमीन कवडीमोल भावाने बळकावली जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे भविष्यातील मोठे विस्थापन निर्माण होणार असून वेगवेगळे न लढता एकत्रित संघर्ष केला तरच हा धोका टाळता येणार आहे. त्यादृष्टीने सर्वांना एकत्र संगठीत करण्यासाठी आणि या संघर्षात सर्वंकष भूमिका ठरविण्यासाठी गडचिरोली येथे गुरुवार दिनांक २६ जून रोजी जिल्हाभरातील ग्रामसभा, विविध राजकीय पक्ष, संगटना, पर्यावरणवादी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करुन सामुहिक भूमिका मांडण्यात येणार आहे. व त्यानंतर या बळजबरी अन्यायाविरूद्ध व्यापक आवाज बुलंद करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे नेते धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धनराज दामले, झेंडेपारचे ग्रामस्थ प्रा. अनिल होळी, अतुल मडावी, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, माकपचे गडचिरोली तालुका सचिव काॅ. डाॅ. धर्मराज सोरदे प्रामुख्याने उपस्थित होते.