*७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड, राष्ट्रवादीचा जिल्हा युवक कार्याध्यक्ष मनीष दुर्गे यांची चौकशीची मागणी*

82

*७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड, राष्ट्रवादीचा जिल्हा युवक कार्याध्यक्ष मनीष दुर्गे यांची चौकशीची मागणी*

 

एटापल्ली, १४ जुलै २०२५ —

एटापल्ली नगर पंचायतच्या हद्दीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेली १० जलशुद्धीकरण संयंत्रे सध्या गायब अथवा निष्क्रिय अवस्थेत असून, तब्बल ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी श्री मनिष दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

जनतेची फसवणूक – निधी गेला वाया, पाणी नाही पुरवठा

निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येकी संयंत्रासाठी सुमारे ७ लाख रुपये खर्च करून बसवलेली यंत्रणा आज केवळ धुळखात पडलेली नसून काही ठिकाणी तर संपूर्ण गायब झालेली आहे. यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे तर लांबच, पण सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २ (गोटूल भवन, जीवनगट्टा) येथील संयंत्राजवळील नाल्यांमध्ये साचलेली घाण याचे जिवंत उदाहरण आहे.

 

कंत्राटदार गायब, प्रशासन गप्प – कोण जबाबदार?

या प्रकल्पांची ५ वर्षे देखभाल कंत्राटदाराकडे होती, परंतु नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही देखभाल करवून घेतलेली नाही, तसेच संयंत्रे गायब झाल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविण्याची तसदीही घेतलेली नाही. ही गंभीर दुर्लक्षाची बाब असून, प्रशासनाची संगनमताने झालेली भ्रष्टाचारी कारवाया असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका – मागण्या खालीलप्रमाणे:

1. संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व निलंबनाची कार्यवाही करावी.

2. गायब झालेली संयंत्रे संदर्भात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

3. नागरिकांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

4. प्रकल्पावर जिल्हास्तरीय विस्तृत आर्थिक ऑडिट करून निष्कर्ष सार्वजनिक करावा.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र आंदोलन

या भ्रष्टाचारप्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

 

निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रमुख कार्यकर्ते –

मनिष दुर्गे, पाचू भाऊ मंडल, प्रशांत कोकुलवार, अनिकेत हिचामी (शहर अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी), अर्शद शेख, शंतनू ऊईके,पाचू भाऊ मंडल

प्रशांत कोकुलवार,अनिकेत हिचामी

शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी,अर्शद शेख

शंतनू ऊईके आदींचा समावेश होता..

 

विनीत-

राष्ट्रवादी काँग्रेस, एटापल्ली

संपर्क – मनिष दुर्गे, जिल्हा युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष गडचिरोली