Home Breaking News  *एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार ; एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा* 

 *एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार ; एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा* 

13

 

*एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार ; एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा*

 

*“स्टील हब बनवत आहेत की शेतकरी मृत्यूचा हब?” — महेंद्र ब्राह्मणवाडे*

 

चामोर्शी : शेतकरी बचाव जनआंदोलन समिती भेंडाळाच्या वतीने गुरुवारी (२१ मे) एमआयडीसीसाठी सुपीक जमीन अधिग्रहण करण्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडक दिली.

 

“एमआयडीसी रद्द करा”, “सुपीक जमीन वाचवा”, “शेतजमीन देणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, अशी ठाम भूमिका मांडली.

 

यावेळी शासनावर जोरदार टीका करत आंदोलनाचे नेतृत्व करणारे महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, “सरकार स्टील हब उभारत आहे की शेतकरी मृत्यूचा हब तयार करत आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सुपीक जमीन हिरावून घेतली तर हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील. शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे निर्णय आम्ही सहन करणार नाही.”

 

निवेदनात सुपीक, बागायती व सिंचनाखालील शेतजमीन कोणत्याही औद्योगिक प्रकल्पासाठी संपादित करू नये, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत काढण्यात आलेल्या अधिसूचना व नोटिस तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

 

तसेच औद्योगिक प्रकल्पासाठी शासनाने पडीत, वनविरहित अथवा शासकीय जमीन वापरण्याचा पर्याय स्वीकारावा, असेही आंदोलकांनी नमूद केले.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शेती हा परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत असून जमीन गेल्यास हजारो कुटुंबे बेरोजगार व विस्थापित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे कोणतेही निर्णय शासनाने घेऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली.

 

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, CPI चे देवराव भाऊ चवडे, मनोज पोरटे, अमोल मारकवार, भेंडाळ्याच्या सरपंच सौ. कुंदा जुवारे, पवन गेडाम, सरपंच सुधाकर भाऊ गद्दे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, राजेश ठाकूर, दिगंबर धानोरकर, विजय लाड यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भेंडाळा व परिसरातील डेटेकुली, खडखोळा, चारगाव, रामाळा, मोहुर्ली, फराडा, फोकुर्डी, वाघोली, वेलतूर रिठ, संगणापूर, कान्होली, नवगाव माल, चाकलपेठ आदी गावांतील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

Don`t copy text!