*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव आमंत्रित*
*प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 12 जून*
गडचिरोली, दि. 3 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन 2025-26 साठी पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी 1 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अपेक्षित संख्येने प्रस्ताव प्राप्त न झाल्याने प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत आता 12 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी समाजहित, राष्ट्रनिर्माण, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, क्रीडा, सांस्कृतिक विकास, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येते.
पुरस्कारासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रे, कार्याची पुरावे, पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणारे दस्तऐवज, पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तसेच शासन निर्णयानुसार आवश्यक हमीपत्रांसह आपले प्रस्ताव दोन प्रतींमध्ये बंद लिफाफ्यात 12 जून 2026 पर्यंत सादर करावेत.
युवक व युवतींसाठी अर्जदाराचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी किमान 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी कमाल 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असावे. तसेच अर्जदाराने स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्य केलेले असावे आणि पुरस्कार प्राप्तीनंतर किमान दोन वर्षे सक्रिय राहण्याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी असणे बंधनकारक असून संस्था किमान पाच वर्षे कार्यरत असावी. संस्थेने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे तसेच सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत केलेल्या कार्याचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, विज्ञान-तंत्रज्ञान, कला, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी व दुर्बल घटकांच्या विकासासाठी केलेले कार्य तसेच राष्ट्र उभारणीस हातभार लावणारे उपक्रम यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील युवक, युवती आणि युवा विकासासाठी कार्यरत संस्थांनी या पुरस्कारासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाळे यांनी केले आहे.






