Home Breaking News *गडचिरोलीत श्रमशक्ती व असंघटित उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ* ...

*गडचिरोलीत श्रमशक्ती व असंघटित उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ* *नागरिकांनी क्षेत्रीय पथकांना सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

11

*गडचिरोलीत श्रमशक्ती व असंघटित उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ*

 

 

*नागरिकांनी क्षेत्रीय पथकांना सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

 

*विकसित महाराष्ट्रासाठी जिल्हानिहाय अचूक माहिती संकलनाला सुरुवात*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. १५ : राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, गडचिरोली जिल्ह्यात या महत्त्वपूर्ण सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या सर्वेक्षणातून जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे वास्तव चित्र समोर येणार असून नागरिकांनी सर्वेक्षण पथकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

 

जिल्हास्तरावरील आर्थिक, सामाजिक आणि रोजगारविषयक निर्देशकांची विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून विकास नियोजन अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाने जिल्ह्याच्या विकासाला राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू मानत प्रत्येक जिल्ह्याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्तीचा सहभाग, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची स्थिती, उत्पन्नाचे स्रोत तसेच विविध सामाजिक-आर्थिक बाबींची सविस्तर माहिती या सर्वेक्षणाद्वारे गोळा केली जाणार आहे.

 

या सर्वेक्षणातून उपलब्ध होणारी माहिती राज्य व जिल्हास्तरावरील विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध धोरणे निश्चित करण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगाराच्या संधी, उद्योजकतेची स्थिती, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची वाढ आणि नागरिकांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास या माध्यमातून होणार असल्याने विकास नियोजनाला अधिक वैज्ञानिक आधार मिळणार आहे.

 

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत एकूण ६ हजार ८२८ नमुना घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी २७६ अन्वेषक व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर माहिती संकलनाचे काम करण्यात येणार आहे. संकलित आकडेवारीचा उपयोग ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विकास योजनांच्या आखणीसाठी करण्यात येणार आहे.

 

सर्वेक्षणाचे क्षेत्रीय कामकाज आयपीएसओएस रिसर्च, मुंबई या संस्थेमार्फत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त पथके घरभेटी देऊन नागरिकांकडून माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अचूक व सत्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उप आयुक्त ज्ञानेश्वर खडतकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील विकासाचे वास्तव चित्र समोर आणून भविष्यातील नियोजन अधिक परिणामकारक करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

0000

Don`t copy text!