*मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, नरेंद्र मोदी योगी तर सत्ताभोगी: हर्षवर्धन सपकाळ*
*सुरजागडच्या खदानीतून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी फडणवीसांचा गडचिरोलीत मुक्काम, गडचिरोलीचे फडणवीसस्थान बनवण्याचा डाव.*
*महाराष्ट्रातील भाजपा युतीचे सरकार चोरीचे, विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करा.*
*काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत शेतकरी न्याय पदयात्रा व मशाल मोर्चा.*
गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५:
नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने आजपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. आज गडचिरोलीत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, आ.रामदास मसराम ,आ.अभिजीत भाऊ वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, निरीक्षक सचिन भाऊ नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर, पाटील पोरेटी , सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व सेलअध्यक्ष, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते. मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदुषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खदानीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ असे भाजपा युती सरकारचे सुरु आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या. शेतकऱ्यांशी बेईमानी कऱणा-या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल. लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे, ५०० रुपये हातात टेकवत आहेत. सरकार कितीही सांगत असले तरी लाडकी बहिण योजना बंद करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा युती सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
*शेतकरी नाही पदयात्रेतील प्रमुख मागण्या*
1. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन योग्य हमीभाव देण्यात यावा.
2.. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रानटी हत्ती, वाघ, अस्वल, रानडुक्कर यांचा वावर वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी व शेत पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, व जास्तीत जास्त नुकसानभरपाई ५० हजार वरून, १ लक्ष रुपये करण्यात यावी किंवा नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी, नुकसान भरपाईत शेतीच्या इतर साहित्यांचा समावेश नाही, फक्त ५ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्याच्या सोलरपंपचा पनल हत्तीने तोडल्यास त्याची नुकसान भरपाई वास्तविक नुकसान झाल्याच्या अनुपातात देण्यात यावी.
3. शेतकर्यांना प्रति हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आला होता, परंतु अजूनही बोनस देण्यात आले नाही. बोनस त्वरित देण्यात यावा.
4. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक भरपाई दिली जावी.
5. गडचिरोली जिल्हातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने, शेतकऱ्यांना सोलर पंपची सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु सोलर पंप त्वरित लावून देण्यात येत नाही तसेच ते बंद पडल्यास कंपनी कडून सेवा मिळत नाही, करिता ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच डिमांडची रक्कम भरली आहे त्यांना वीज जोडणी देण्यात यावी व डिमांड रकमेचा परतावा देणे बंद करण्यात यावा व २४ तास वीज देण्यात यावी.
6. गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळाकरिता सुपीक शेत जमिनी अधिग्रहीत न करता त्याऐवजी शहरालगत असलेल्या सायन्स कॉलेजच्या शेजारी पडीत व झुडपी जंगली जमीन अधिग्रहीत करावी.
7. उद्योग स्थापनेच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी केल्या जात आहेत. या प्रकरणांची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा.
8. वनपट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांना सात पिढ्यांची अट शिथिल करून कायमस्वरूपी वनपट्टे द्यावेत.
9. गडचिरोली जिल्हातील सुरजागड प्रकल्पातून सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था होऊन जिल्ह्यात व गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणत अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गडचिरोली शहरातून मुख्य रस्त्याने अवजड वाहनाने खनिजाची वाहतूक होत असते त्यामुळे अपघात होत असतात. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागले आहे. असे पुन्हा घडू नये यासाठी शहराबाहेरुन बायपास करण्यात यावा. तोपर्यंत शहरातून खनिज वाहतूक बंद ठेवण्यात यावी.
10. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील कोणत्याही निष्पाप नागरिकाचा जीव जावू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस आणि आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा.
11. गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, सुरजागड व लाँयडमेटलच्या कोनसरी प्रकल्पामध्ये किमान ८० % स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे धोरण असतांना त्याची पायमल्ली केली जाते. तसेच या बाबतची माहिती दिली जात नाही, ती उपलब्ध व्हावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी.
12. पावसाळ्यात गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या अति विसर्गाने व मेडीगट्टा धरणातील ब्याक वॉटरमुळे जिल्ह्यात दरवर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे व गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात .
13. रोजगार हमी योजनांतील मजुरांचे मजुरी देयक, सिंचन विहिरीचे अनुदान, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान, शासनस्तरावर प्रलंबित असून तातडीने देण्यात यावे.
14. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व कर्जाच्या योजनांत सुलभता देण्यात यावी.
15. मान्सून पूर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे.