*विकास निधीतून दरडोई उत्पन्न वाढविणाऱ्या रोजगार निर्मितीच्या योजना राबवा*

7

*विकास निधीतून दरडोई उत्पन्न वाढविणाऱ्या रोजगार निर्मितीच्या योजना राबवा*

 

*- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला गती देणे यासाठी शासनाच्या सर्व निधींचा वापर सृजनशीलपणे करण्याच्या सूचना राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास व कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.

 

*रोजगारक्षम योजनांवर भर*

 

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले की, शासनाचा विकासनिधी केवळ रस्ते, पूल, इमारती यावर खर्च न करता तो थेट नागरिकांच्या हातात रोजगार निर्माण करणाऱ्या योजनांसाठी वापरण्यात यावा. त्यामुळे नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढून त्यांचा उदरनिर्वाह सक्षम होईल.

 

*कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी गडचिरोलीत वसतिगृहांची गरज*

 

गडचिरोली शहरात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी येणाऱ्या युवक-युवतींसाठी वसतिगृहांची तीव्र गरज असून, हे वसतिगृह खनिज प्रतिष्ठान किंवा जिल्हा नियोजन निधीतून उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

*’मेक इन गडचिरोली’ ब्रँडची संकल्पना*

 

कृषी विभागाच्या विजन डॉक्युमेंटचा आढावा घेताना, ॲड. जयस्वाल यांनी ‘मेक इन गडचिरोली’ या नावाने जिल्ह्याची एक ब्रँड ओळख निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला. रानमेवा, सेंद्रिय उत्पादने व आदिवासी वस्तू यांची बाह्य बाजारपेठेत विक्री वाढवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, असे ते म्हणाले.

 

*सेंद्रिय तालुक्यांची निर्मिती आणि विक्री यंत्रणा उभारण्याचे निर्देश*

 

जिल्ह्यातील एक तरी तालुका ‘सेंद्रिय तालुका’ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले. यासोबतच प्रशासनाने सेंद्रिय उत्पादनांची विक्री यंत्रणा स्वखर्चाने उभारावी, असेही त्यांनी सुचवले.

 

*रोजगार निर्मितीसाठी बहुविभागीय समन्वय*

 

कौशल्य विकास, महिला व बालविकास, माविम, उमेद, कृषी विभाग यांनी रोजगारनिर्मिती हा केंद्रबिंदू मानून एकत्रित प्रयत्न करण्याचे सहपालकमंत्र्यांनी सांगितले.

 

या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे, महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, तसेच उमेद, माविम व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.