*शेती दिनानिमित्त कृषी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*
गडचिरोली, दि. ९ ऑगस्ट – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ८ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘शेती दिन’ साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक कुमारी मधुगंधा जुलमे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री धर्मेंद्र गिरीपुंजे, श्री परांजपे व श्री वसवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, पोकरा अंतर्गत शेती शाळा, पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू व फळबाग लागवड अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजकता वाढविण्यासाठी श्रीमती योगिता सानप यांनी आभासी माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत गडचिरोली जिल्ह्यातील रानभाज्या व वनोपज यांचे प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याची संधी अधोरेखित केली.
पोकरा अंतर्गत शेती शाळा यशस्वीपणे राबविण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री भूषण देशमुख यांनी मार्गदर्शन केले, तर प्रभारी तालुका कृषी अधिकारी कुरखेडा श्री सरदार यांनी सामूहिक खेळ व गटचर्चा यांचे प्रात्यक्षिक सादर केले. खरीप हंगामातील मुख्य पिकांवरील कीड, त्यांची आर्थिक नुकसान पातळी आणि व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ श्री पुष्पक बोथीकर यांनी सविस्तर माहिती दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व बांबू लागवडीचे महत्त्व यावर तंत्र अधिकारी (फलोत्पादन) श्री आनंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी सूचना देत ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना’विषयी माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






