भाकपाच्या दबावामुळे SBIची धावपळ — गडचिरोली येथून वरिष्ठ अधिकारी एटापल्लीला दाखल; शाखेतील अव्यवस्था दूर करण्याचे लेखी आश्वासन
एटापल्ली (प्रतिनिधी) : एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक शाखेतील गंभीर अनियमितता, ग्राहकांची होत असलेली प्रचंड गैरसोय आणि भाकपाने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेरीस SBI प्रशासन हलू लागले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन देत शाखेतील कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केल्यानंतर, स्वतः गडचिरोली येथून SBI चे मुख्य प्रबंधक संदीप कुमार आणि अधिकारी मंगेश सोनटक्के एटापल्ली शाखेत धाव घेऊन आले. त्यांनी भाकपाच्या शिष्टमंडळासोबत तातडीची बैठक घेत परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
भाकपाने उघड केलेली अनियमितता
भाकपाने दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे अधोरेखित करण्यात आले होते —
शाखा ठरलेल्या वेळेत न उघडणे
कर्मचारी वेळेवर न येणे
लंचच्या नावाखाली काऊंटर बंद ठेवणे
एटीएम सेवा नेहमी बंद असणे
ई-KYC प्रक्रियेत अनावश्यक विलंब
ग्राहकसेवेत निष्काळजीपणा आणि वागणुकीतील ढिसाळपणा
ही सर्व बाबी RBI च्या ग्राहक सेवा नियमावलीचे सरळ उल्लंघन असल्याचा आरोप भाकपाने केला होता.
यावर संतप्त नागरिक आणि भाकपा नेत्यांनी शाखा व्यवस्थापनास कडक शब्दांत इशारा दिला होता की, वेळेत सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल.
अधिकाऱ्यांची तातडीची धावपळ — एटापल्ली शाखेत थेट बैठक
या इशाऱ्याचा परिणाम म्हणून गडचिरोली येथील SBI चे मुख्य प्रबंधक संदीप कुमार आणि अधिकारी मंगेश सोनटक्के हे तातडीने एटापल्लीला दाखल झाले. शाखेतच भाकपाचे नेते, कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिकांसमोर खुली चर्चा घेण्यात आली.
भाकपाच्या प्रतिनिधींनी सर्व समस्या दस्तावेजांसह मांडल्या. ग्राहकांनीही त्यांची होत असलेली गैरसोय प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या समोर सांगितली.
शाखेतील अव्यवस्था मान्य — SBI कडून भाकपाला लेखी आश्वासन
सविस्तर चर्चेनंतर SBI अधिकाऱ्यांनी चुका मान्य करत खालील तीन महत्त्वपूर्ण आश्वासने लेखी स्वरूपात दिली —
१. सोमवारपासून एटापल्लीला नवीन ब्रांच मॅनेजरची नियुक्ती
दीर्घकाळापासून व्यवस्थापनातील ढिलाई दूर करण्यासाठी तात्काळ नवीन मॅनेजर पाठवण्याचे आश्वासन.
२. एका आठवड्यात एक अतिरिक्त लिपिकाची नियुक्ती
ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे गती नसलेल्या कामकाजावर उपाय म्हणून एक लिपिक देण्यात येणार.
३. ग्राहकांचे KYC आणि दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्याची हमी
अनावश्यक विलंब आणि त्रास न देता सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जातील.
अधिकाऱ्यांनी यासाठी लिखित दस्तऐवज भाकपाला दिले.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचा ठाम इशारा — “जनतेच्या समस्या न सुटल्यास आंदोलन थांबणार नाही”
बैठकीच्या शेवटी बोलताना भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले “जनतेच्या पैशावर चालणारी बँक जनतेलाच त्रास देत असेल, तर भाकपा शांत बसणार नाही. आम्ही दिलेल्या मुदतीत सुधारणा केल्या नाहीत तर आंदोलन मागे घेणार नाही. गरज पडल्यास २०१९ प्रमाणे टाळा-ठोको आंदोलन पुन्हा होईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.”
बैठकीत उपस्थित नेते व नागरिक
या चर्चेत भाकपा व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रमुख —
कॉ. सचिन मोतकुरवार,
कॉ. सुरज जक्कुलवार,
कॉ. रवी अलोने,
कॉ. शुभम वन्नमवार,कॉ सुरज बावणे, कॉ प्रमोद देवतळे,
कॉ. विलास नरोटी,
तसेच स्थानिक व्यपारी नागरिक
राहुल मोहूर्ले, विलास चितमलवार, हरीश कुमरे, जांभुळकर सर
इत्यादींचा सहभाग होता.
भाकपाची भूमिका ठाम — “सुधारणा करा, नाहीतर जनचळवळ उभारू”
भाकपाने यापुढे SBI प्रशासनावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेले लेखी आश्वासन वेळेवर पाळले नाही, तर भाकपा तीव्र संघर्ष पुन्हा उभारेल, अशी माहिती पक्षाने दिली.
एटापल्लीतील नागरिक मात्र SBI च्या सुधारणा प्रत्यक्षात कधी दिसतील याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.





