*वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रलंबित बोनस तात्काळ अदा करा; मुख्यमंत्री यांना पत्र लिहून खासदार डॉ. नामदेव किरसाण यांची मागणी*
गडचिरोली :: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रती हेक्टरी रु. 20,000/- बोनस जाहीर करून त्याचे वितरण केले, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे सात हजारांहून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना आजतागायत त्यांच्या हक्काचा बोनस प्राप्त झालेला नाही.
गडचिरोली हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा असून येथील बहुतांश शेतकरी वनक्षेत्रातील वनजमिनीवर शेती करून उपजीविका चालवितात. संबंधित शेतकऱ्यांना शासनाने वनपट्टे दिले असून ते नियमित महसूल नोंदीत सातबारा धारकांप्रमाणेच शेती करीत आहेत. तथापि, बोनस वितरणाच्या प्रक्रियेत फक्त सातबारा धारक शेतकऱ्यांचाच लाभ होत असून वनपट्टेधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना येथे राहणाऱ्या गोर-गरीब, अल्पभूधारक व वनपट्टाधारक शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या बोनससाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे, ही अत्यंत दुःखद व शेतकरीविरोधी परिस्थिती असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बाबीकडे लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर सर्व वनपट्टेधारक शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली बोनसची रक्कम तात्काळ अदा करावी , अशी मागणी गडचिरोली- चिमर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे पत्राद्वारे केली आहे.





