Home Breaking News खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

7

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

 

गर्देवाडा (ता. एटापल्ली):

ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, या योजनेत वापरण्यात येणारे पाणी साठवणूक करणारे ड्रम खराब झाल्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प झाली होती. परिणामी गावातील नागरिकांना, विशेषतः महिला व लहान मुलांना, पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत होते, तर काही ठिकाणी असुरक्षित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत होती.

 

या गंभीर समस्येबाबत गावातील नागरिकांनी भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जक्कुलवार, कॉ. विलास नरोटी, ग्रामपंचायत सदस्य कॉ. सततू हेडो, कॉ. चैतु नरोटी तसेच इतर कॉम्रेड्स यांच्याकडे मदतीची मागणी केली. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार संबंधितांनी तात्काळ या प्रश्नाची दखल घेतली व प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा सुरू केला.

 

भाकपाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार शासन व संबंधित विभागाकडे निवेदने देत, अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत अखेर खराब झालेले जुने ड्रम काढून नवीन ड्रम बसविण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

 

यामुळे गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सांगितले की, “भाकपा नेहमीच जनतेच्या सेवेत राहून रात्रंदिवस काम करते,” असे मत व्यक्त करण्यात आले.

 

यावेळी भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज असून कोणत्याही गावात पाण्याच्या प्रश्नामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी भाकपा नेहमीच संघर्ष करत राहील. प्रशासनानेही अशा योजनांची वेळोवेळी दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.”

 

स्थानिक नागरिकांना भविष्यातही गावातील मूलभूत समस्यांवर अशाच प्रकारे भाकपा कडून काम करून मिळेल.

Don`t copy text!