Home Breaking News *दुर्गम गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण प्रवाहात आणणारा समाज कल्याण विभागाचा ‘मिशन-२००’ उपक्रम*

*दुर्गम गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण प्रवाहात आणणारा समाज कल्याण विभागाचा ‘मिशन-२००’ उपक्रम*

8

*दुर्गम गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण प्रवाहात आणणारा समाज कल्याण विभागाचा ‘मिशन-२००’ उपक्रम*

 

*तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ : दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. या उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण, निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना देशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सक्षम करण्यात आले.

 

बारावी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुक व गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासाठी ४५ दिवसांचा निवासी क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला. संकल्प फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शन, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, इंग्रजी संवाद कौशल्य, तार्किक विचार क्षमता, मुलाखत तंत्र आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून, आतापर्यंत ७८ विद्यार्थ्यांनी देशातील विविध नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत यश संपादन केले आहे. यामध्ये नवनिर्मित विद्यापीठात ३६, फर्ग्युसन महाविद्यालय/विद्यापीठात ३२, अशिम प्रेमजी विद्यापीठात ०६, जी.आर.एफ. विद्यापीठात ०२ तसेच शिव नाडर विद्यापीठ, आयआयएचएस-१ आणि एनआयटी-१ विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.

 

देशातील ४६ केंद्रीय विद्यापीठे तसेच १०० हून अधिक नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी CUET ही समान प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षी १५ मे ते ३१ मे दरम्यान झालेल्या या परीक्षेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. आगामी काळात CUET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

 

समाज कल्याण विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. ‘मिशन-२००’ हा केवळ प्रवेश मिळवून देणारा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, करिअर दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक क्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा शैक्षणिक प्रयोग ठरत आहे.

Don`t copy text!