भावी युवा पिढी समोरील आव्हाने,समस्या आणि उपाय

42

भावी युवा पिढी समोरील आव्हाने,समस्या आणि उपाय

प्रस्तावना : स्वामी विवेकानंद हे भारतीय विचारवंत, योगी, आणि आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी या दिवशी जयंती असते. १२ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारतीय तरुणांना समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरित केले. तसेच समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांचा विश्वास होता की, युवकांमध्ये अपार शक्ती आहे आणि योग्य मार्गदर्शनाने ते देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतात. मात्र, सध्याची युवा पिढी अनेक आव्हाने आणि समस्यांचा सामना करत आहे, ज्यांवर उपाय आवश्यक आहे.प्रस्तुत लेखात युवा पिढीसमोरील आव्हाने,समस्या आणि त्यावरील उपाय याचा उहापोह केला आहे.वाचकांना याचा निच्छित लाभ होईल.

१. शिक्षण व कौशल्य विकासातील अडथळे : आजकालच्या शैक्षणिक प्रणालीत बदल आवश्यक आहे, कारण केवळ पारंपरिक शिक्षण पद्धती पुरेशी नाही. तरुण पिढीला डिजिटल कौशल्ये, नवनविन ऊपक्रम, आणि व्यवसायिक प्रशिक्षणाची गरज आहे. शिक्षण संस्थांमधून मिळणारे शिक्षण व्यावहारिक नाही असे तरुणांना वाटते. परिणामी, उपलब्ध रोजगाराच्या संधी मर्यादित वाटतात. शिक्षणात संधींची कमतरता आणि कौशल्यांमधील असमाधान ही एक मोठी समस्या ठरली आहे.

२. बेरोजगारी व करिअर निवडण्याची समस्या : तरुण पिढीला आजच्या बाजारपेठेत करिअर घडवण्यात अनेक अडथळे येतात. बेरोजगारी ही एक प्रमुख समस्या असून, उच्च शिक्षण घेतल्यानंतरही चांगल्या नोकऱ्या मिळणे अवघड झाले आहे. याशिवाय, करिअर निवडण्याबाबतची गोंधळलेली मानसिकता, फक्त सरकारी नोकरीकडे लक्ष केंद्रीत असणे, उद्योग क्षेत्रातील माहितीचा अभाव आणि नवीन संधींचा शोध घेण्यात उदासीनता यामुळे तरुणांमध्ये नकारात्मकता येते.

३. मानसिक आरोग्याचे संकट : दिवसेंदिवस तरुण पिढीत मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. करिअर, स्पर्धा, अपेक्षा आणि समाज माध्यमांवर होणाऱ्या ताण-तणावांमुळे मानसिक समस्या गंभीर होत आहेत.यातून डिप्रेशन, चिंता, ताण,आणि आत्महत्येचे विचार या समस्या वाढल्या आहेत. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता आणि उपचाराच्या सुविधांचा अभाव यामुळे हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

४. व्यसनाधीनता व तणाव व्यवस्थापन : सध्याच्या काळात, अनेक तरुण धूम्रपान, मद्यपान आणि ड्रग्जच्या आहारी जात आहेत. ही व्यसने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतात. तणावाचे व्यवस्थापन न जमल्यामुळे व्यसनाधीनता वाढत आहे. अशा प्रकारे, तरुणांच्या उर्जेचा अपव्यय होत असून, त्यांचे आयुष्य प्रभावित होत आहे.

५. डिजिटल माध्यमांचा अत्यधिक वापर आणि सामाजिक आयुष्याचा अभाव : डिजिटल माध्यमे आजच्या तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग आणि तंत्रज्ञानात अधिक गुंतल्याने अनेक तरुण आभासी जगात अडकले आहेत. परिणामी, त्यांचे सामाजिक आयुष्य, संवाद कौशल्य आणि वास्तव जगातील नाती कमकुवत झाली आहेत. आभासी जगात अडकणे ही तरुणांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी मोठी समस्या ठरली आहे.

६. नैतिकता आणि समाजातील गोंधळलेली भूमिका :आजची युवा पिढी आपल्या समाजातील नैतिक मूल्यांपासून काहीशी दूर गेली आहे असे जाणवते. समाजातील वाढती हिंसा, असहिष्णुता आणि सामाजिक दृष्टिकोनातील फरक यामुळे तरुणांचे मानसिक संतुलन बिघडते. समाजाची बदलती मूल्ये आणि आधुनिक जीवनशैलीतील दडपण या समस्या अधिक गंभीर बनवत आहेत.

७.या समस्यांवर उपाय आणि प्रेरणा : या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षण व्यवस्था अधिक व्यावहारिक करणे, डिजिटल साक्षरता वाढवणे, मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन व सल्लागार सुविधा उपलब्ध करणे आणि तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासोबतच, तरुणांनी स्वतःला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सशक्त ठेवले पाहिजे. तरुण पिढी ही देशाची अमूल्य संपत्ती आहे, परंतु या पिढीने स्वतःच्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला तरच स्वतःबरोबर देशाची प्रगती शक्य आहे.यामुळेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, देशप्रेम आणि परिश्रमाचे महत्व याविषयी युवकांना दिलेली शिकवण आजही बहुमोल आहे. त्यांचे “ऊठ, जागा हो, आणि जोपर्यंत लक्ष्य गाठत नाहीस तोपर्यंत थांबू नकोस” हे शब्द तर युवकांसाठी प्रेरणादायक आहेत. तसेच, स्वामी विवेकानंदानी आत्म – उद्धरणाविषयी युवकांनी आपल्यातील दैवी गुण शोधून त्यांचा विकास करावा, असे म्हटले आहे. त्यांनी आत्मविश्वास, कार्यनिष्ठा, समाजसुधारणेचे कार्य, आणि राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व शिकवले. या शिकवणीचा आपल्या जीवनात अवलंब केला, तर आपल्या जीवनातील उद्दिष्ट साध्य होऊन आपला समाजही समृद्ध होईल. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्यातील दोष काढून टाकून गुणसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्यक्षात कसे करायचे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

८.आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्याची आवश्यकता : व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कृती आदर्श व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम आणि व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. म्हणूनच आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते.

९.सुखी जीवन जगण्यात ‘स्वभावदोष’ हा मोठा अडथळा :‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।’ या वचनानुसार मन हेच मनुष्याच्या बंधनास (जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्यास) आणि मोक्षास (जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून सुख-दुःखाच्या पलीकडे असलेल्या आनंद आणि शांती यांची नित्य अनुभूती मिळण्यासाठी) कारणीभूत असते. व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोष, हे व्यक्तीच्या दुःखास, तर गुण, हे व्यक्तीला सुख मिळण्यास कारणीभूत असतात. दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगांत आपल्याकडून होणाऱ्या वर्तनावरून आपल्यातील गुण-दोष लक्षात येतात. स्वभावदोषांमुळे जीवनात पदोपदी संघर्षाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते. असे तणाव निर्माण झाल्यानंतर त्याचे खापर आजूबाजूचे वातावरण, परिस्थिती आणि अन्य व्यक्तींचे स्वभावदोष यांवर फोडले जाते; पण त्यामागील मूळ कारण असलेले स्वतःमधील स्वभावदोष शोधण्याचा प्रयत्नच केला जात नाही. त्यामुळे स्वभावदोष आहेत तसेच रहातात. परिणामी मनःशांती मिळत नाही; म्हणूनच जीवन सुखी होण्यासाठी स्वभावदोषांचा अडथळा दूर करणे अनिवार्य आहे.साधनेतही स्वभावदोषांचाच (षड्रिपूंचाच) प्रामुख्याने अडथळा असतो. स्वभावदोषांच्या माध्यमातून षड्रिपूंचे प्रकटीकरण होते. त्यामुळे साधनेने मिळालेली ऊर्जा स्वभावदोषांमुळे होणाऱ्या चुकांमुळे खर्ची पडते. स्वभावदोष म्हणजे चित्तातील जन्मोजन्मीचे संस्कार. ते चित्तात खोलवर रुजलेले असतात. म्हणूनच स्वभावदोष-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अपरिहार्य ठरते.

राष्ट्राची दुःस्थिती दूर करण्यासाठी सुसंस्कारित समाजमनाची आवश्यकता : प्रचलित समाजव्यवस्थेमध्ये अनेक दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला आहे. समस्त राष्ट्रवासियांना धर्म आणि नीती यांचा पडलेला विसर आणि त्यांची होणारी घोर विटंबना यांमुळेच राष्ट्राला अवकळा आलेली आहे. समाजव्यवस्था सुस्थित करण्यासाठी स्वतःतील दुर्गुणांचे निर्मूलन आणि गुणांचे संवर्धन करणे, हे समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य ठरते. धर्म आणि जीवन यांची सांगड घालून समाजमन सुसंस्कारित करण्यासाठी आणि समाजातील घटकांमध्ये आंतरिक ऐक्य निर्माण करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, तसेच गुणांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यातूनच स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असा युवक निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने युवा दिन साजरा झाला असे म्हणता येईल.

 

संकलक : श्रीमती विभा चौधरी

सौजन्य : सनातन संस्था

संपर्क क्रमांक :7620831487