Home गडचिरोली *नवनिर्वाचित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी नागरिककेंद्री कामकाज करावे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

*नवनिर्वाचित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी नागरिककेंद्री कामकाज करावे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

59

*नवनिर्वाचित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी नागरिककेंद्री कामकाज करावे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

 

*वेळेत कामे पूर्ण करून नागरिकांचा विश्वास जिंकण्याचे आवाहन; निधी मिळवण्यासाठी नियमांचा अभ्यास करण्याच्या सूचना*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ५:

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपरिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर नागरिकांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचे समाधान करणे हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

 

नगरपरिषदेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी नगरसेवकांनी आपल्या अधिकारांचा व कर्तव्यांचा सखोल अभ्यास करावा, तसेच केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा विकास निधीतून नगरपरिषदेसाठी अधिकाधिक निधी कसा उपलब्ध करून घेता येईल, याबाबत नियम व प्रक्रिया समजून घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. यासाठी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

बैठकीदरम्यान नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता व्यवस्था, रिंग रोड, डम्पिंग यार्ड, कचरा प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या समस्यांवर आपली मते व अडचणी मांडल्या. यावर सहपालकमंत्र्यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत प्लास्टिकमुक्त शहराचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

 

नवीन नगरसेवकांची एक सक्षम टीम नगरपरिषदेच्या माध्यमातून काम करत आहे. केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष जनतेमध्ये फिरून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या विश्वासावर खरे उतरले पाहिजे, असे मार्गदर्शन सहपालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 

या बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, विषय समितीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.

Don`t copy text!