उपसा जलसिंचनातील पंपगृहाचे उदघाटन केले
सिरोंचा:- रेगुंठा उपसा जलसिंचनाचे युद्धपातळीवर काम सुरू असून रेगुंठा व परिसरातील गांवे आता सुजलाम-सुफलाम होणार असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते बुधवार 12 मे रोजी रेगुंठा उपसा सिंचन योजनेतील पंपगृह बांधकामाच्या उदघाटनाच्यावेळी बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर , कार्यकारी अभियंता संतोष मेश्राम, सरपंच सतीश आत्राम, उपसरपंच श्रीनिवास कडार्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी बांधकाम उदघाटनाचे पूजन करून नारळ फोडले.
या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, माझे पुर्वी पासूनच शिक्षण, सिंचन, आरोग्य, ‘ गाव तिथे बससेवा’ हे व्हिजन व मिशन होते. त्या दृष्टीने रेगुंठा उपसा जलसिंचनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रेगुंठा व परिसरातील सतरा गावांना पाण्याची सोय व लाभ मिळणार असून रेगुंठा जलउपसा सिंचनामुळे मुबलक पाणी व शेतात बारमाही पिके घेता येणार त्यामुळे गावे व शेती आता सुजलाम-सुफलाम होणार असल्याचे आवर्जून सांगितले.
तसेच पुढे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी , रेगुंठा उपसा जलसिंचनासोबतच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अजून चार उपसा जलसिंचनासाठी शासन दरबारी मागणी व पाठपुरावा सुरू असून या क्षेत्रात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आशावाद आ. आत्राम यांनी बोलून दाखविले.
यावेळी सत्यनारायण परपटलावार, सतीश कडार्ला, अभियंता रवींद्र मेश्राम व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.