*सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण हे अप्रत्यक्षपणे एस.सी., एस. टी., ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव— डॅा. नामदेव किरसान.*
मौजा धर्मपुर ग्रा.प. सोमनपल्ली ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे विरांगणा राणी दुर्गावती महिला मंडल धर्मपुर द्वारा आयोजित “बहिण लाडाची वहिनी काळाची” या दंडारीच्या प्रयोगाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान यांनी केन्द्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणावर सडकून टिका केली. केन्द्रातील मोदी सरकारने बॅंका, विमा कंपन्या, रेल, भेल, सेल, रोडरस्ते, विमानसेवा, हवाई अड्डे, रेल्वे प्लॅाटफार्म इत्यादींसह सर्वच सार्वजनिक (सरकारी) क्षेत्रातील उपक्रमांच्या विक्रीचा म्हणजे खाजगीकरणाचा सपाटा चालविलेला आहे. शासकीय कार्यालयात सचिव, सहसचिव व उपसचिव पदांवर सुद्धा लॅटरल एन्ट्रीच्या नावावर नॅान आय.ए.एस. कर्मचार्यांच्या नियुक्त्या करित आहे. तसेच कंत्राटी पद्धतीवर नियुक्त्या केल्या जात आहेत ज्यामध्ये आरक्षण ठेवले जात नाही. त्यामुळे आरक्षण असुनही आरक्षित पदेच शिल्लक राहणार नाहीत. हा अप्रत्यक्षपणे आरक्षण संपविण्याचा केन्द्रातील मोदी सरकारचा डाव आहे असे त्यांनी स्पष्ट केले. करिता आदिवासांनी आपल्या मुलाबाळांना उच्चशिक्षित करावं व त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी या आदिवासी बहुल गावातील नागरीकांना दिला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा कॅांग्रेस अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, अध्यक्ष सरपंच निलकंठ पाटील निखाडे, ग्रामसेवक श्री बांबोळे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर अनु.जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, विश्वास ओमकंटीवार, नितिन खिरटकर, उपसरपंच निलेश मडावी, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई सिडाम, उपाध्यक्षा अर्चनाताई राऊत, सचिव मनिषाताई घोडाम, कार्यकारी मंडळाच्या सदस्या व मोठ्यासंख्येने प्रेक्षक उपस्थीत होते.





