Home Breaking News “आश्वासनांवर नाही, कृतीवर विश्वास! सामान्य नागरिकांनी वाचवला रुग्णाचा जीव”

“आश्वासनांवर नाही, कृतीवर विश्वास! सामान्य नागरिकांनी वाचवला रुग्णाचा जीव”

56

“आश्वासनांवर नाही, कृतीवर विश्वास! सामान्य नागरिकांनी वाचवला रुग्णाचा जीव”

“माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीच्या नेतृत्वाखाली जनतेची एकजूट; माणुसकीचा जिवंत आदर्श—गरिब रुग्णाला मिळाले उपचाराचे बळ”

 

गडचिरोली जिल्ह्यातील एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या भूमिहीन कुटुंबातील ज्ञानेश्वर उईके हा रुग्ण मागील चार वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक अवस्था इतकी बिकट होती की, आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेणे त्यांच्यासाठी केवळ स्वप्नच बनले होते. आजारपण, गरिबी आणि असहाय्यता यांच्या कचाट्यात सापडलेल्या या कुटुंबाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. या अत्यंत संवेदनशील परिस्थितीची दखल घेत समाजातील काही जागरूक व माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि “माणुसकी अजून जिवंत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती चे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आंधळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच समितीचे तालुका अध्यक्ष अप्रव भैसारे यांच्या नेतृत्वात लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णासाठी आर्थिक मदत उभी करण्यात आली.

या उपक्रमात समाजसेवक जीवनभाऊ नाट, चांगदेव फाये, विनोद खुणे, हेमंत सेंदरे, ग्रामसेवक कन्नाके सर, ग्रामसेवक डोंगरवार मॅडम, देवीकर साहेब, लाडे सर (मुख्याध्यापक व कर्मचारी), भारत डोंगरे, गौरव रामटेके, गणेश भैसारे, सुरेंद्रसिंग गौतम तसेच आरोग्य उपकेंद्र विभागाच्या टीमने सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले. प्रत्येकाने आपल्या परीने दिलेल्या हातभारामुळे एक मोठी मदत उभी राहिली आणि अखेर ज्ञानेश्वर उईके यांना आवश्यक उपचारासाठी आर्थिक आधार मिळाला.

विशेष म्हणजे, या रुग्णासाठी विद्यमान आमदार तसेच इतर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मदतीची विनंती करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने या विनंत्यांना केवळ आश्वासनांची जोड मिळाली; प्रत्यक्ष मदत मात्र मिळू शकली नाही. यामुळे गरजू आणि वंचित घटकांपर्यंत योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचत नसल्याची खंत पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली.

अशा परिस्थितीत कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय, केवळ सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या भावनेतून अप्रव भैसारे यांनी स्वतः पुढाकार घेत लोकवर्गणी उभी केली आणि स्वतःही आर्थिक मदत करून एक आदर्श घालून दिला. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील इतर लोकही प्रेरित झाले आणि एकजुटीच्या बळावर अशक्य वाटणारे कार्य शक्य झाले. ही घटना केवळ एका रुग्णाला मदत मिळाल्याची नाही, तर समाजातील माणुसकी, एकजूट आणि संवेदनशीलतेचा जिवंत पुरावा आहे. आजच्या काळात जिथे अनेकदा राजकारण आणि प्रसिद्धीसाठी केवळ फोटोबाजी केली जाते, तिथे सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कृतीतून दिलेली ही मदत खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरते.

गरजू, गरीब, भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची गरज आहे आणि हीच जाणीव या घटनेतून ठळकपणे समोर येते.

Don`t copy text!